मुख्य संपादक –, योगिता पाटेकर , SP India news channel.,. mo.no..9604343287
वर्धा– अर्पित वाहाने –8956647004
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील एकाच कुटुंबातील तिघांचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत झाल्यानंतर, संपूर्णपणे अनाथ झालेल्या ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला ‘मोनाली गजानन वानखेडे’ हिला तातडीने शासकीय न्याय व आर्थिक संरक्षण मिळवून देण्यासाठी आज, दिनांक २७ मे रोजी ‘वीर अशोक सम्राट संघटना’ च्या वतीने वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. अपघाताला ५ दिवस उलटूनही महसूल किंवा प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी पीडित बालिकेचे सांत्वन करण्यासाठी पोहोचला नसल्याबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी सवाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गत २२ मे २०२६ रोजी समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला येथील रहिवासी श्री. गजानन वानखेडे, त्यांची पत्नी सौ. पल्लवी वानखेडे आणि त्यांची अवघे ६ वर्षांची मुलगी आरोही वानखेडे यांचा एका भीषण रस्ते अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात वानखेडे कुटुंबातील केवळ ७ वर्षांची चिमुरडी ‘मोनाली’ ही एकटीच बचावली असून तिच्या डोक्यावरील आई, वडील आणि बहिणीचे छत्र कायमचे हरवले आहे. सध्या ती हिंगणघाट जवळील जांगोना येथे तिच्या वृद्ध आजोबांकडे (नाना) आश्रयाला आहे. तिचे आजोबा स्वतः अत्यंत गरीब असून शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत या चिमुरडीच्या भविष्याची आणि संगोपनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
या गंभीर आणि संवेदनशील बाबीची दखल घेत ‘वीर अशोक सम्राट संघटना’चे अध्यक्ष विकी सवाई यांनी आज स्थानिक नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवक-जावक विभागात अधिकृत निवेदन सादर करून प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. “शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर होत असताना, प्रत्यक्षात सर्वस्व गमावून अश्रू गाळणाऱ्या या लाडक्या बहिणीची साधी विचारपूस करायला प्रशासनाचा कोणताही तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा पटवारी ५ दिवसांत पोहोचू शकला नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे,” असे विकी सवाई यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या मुख्य मागण्या
१. तातडीची आर्थिक मदत: कुटुंबातील कमावते सदस्य गमावलेल्या या बालिकेला शासनाच्या आपत्कालीन निधीतून तात्काळ आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात यावे मिशन वात्सल्य’ व बालसंगोपन योजना: महिला व बाल कल्याण विभागांतर्गत अनाथ बालकांसाठी राबविल्या जाणाऱ्या ‘मिशन वात्सल्य योजना’ आणि बालसंगोपन योजनेचा लाभ अत्यंत तातडीने सुरू करून तिला दरमहा आर्थिक आधार दिला जावा.
शैक्षणिक व सुरक्षित संगोपनाची जबाबदारी: चिमुरडी मोनाली हिच्या भविष्यातील संपूर्ण मोफत उच्च शिक्षणाची आणि सुरक्षित राहण्याची जबाबदारी प्रशासनाने बाल कल्याण समिती (CWS) च्या माध्यमातून अधिकृतपणे स्वीकारावी.
तात्काळ मानसिक समुपदेशन (Counseling): एकाच क्षणात संपूर्ण कुटुंब डोळ्यांदेखत गमावल्यामुळे ही ७ वर्षांची बालिका प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. तिला बाल विकास विभागामार्फत तातडीने तज्ज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यात यावे.
या निवेदनावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, वीर अशोक सम्राट संघटनेने स्पष्ट केले आहे की, जर या अनाथ चिमुरडीला अत्यंत जलद गतीने शासकीय मदत आणि पुनर्वसनाचा लाभ मिळाला नाही, तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
- आपला नम्र – (विकी महेंद्र सवाई) संस्थापक अध्यक्ष, वीर अशोक सम्राट संघटना, वर्धा
मो. नं.: ९४२२३५९६५७
SP India news Channel मुख्य संपादक योगिता पाटेकर mo.no..9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


