मुख्य संपादक-योगिता पाटेकर मो.9604343287
*चंद्रपूर:* बल्लारपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या ‘बादल हरणे’ टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी अखेर कारवाईचा फास आवळला आहे. सार्वजनिक शांतता भंग करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.बादल वसंता हरणे हा या टोळीचा प्रमुख असून त्याच्यासोबत यासिन अहमद सिद्दीकी आणि योगेश शंकर येरोल या साथीदारांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. या तिघांवर खून, दंगल घडवणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर मार्गाने आर्थिक प्राप्ती करणे हाच या टोळीचा मुख्य उद्देश होता.
आर्थिक पाठबळ आणि गुन्हेगारी वृत्तीच्या सदस्यांचे बळ मिळाल्यामुळे या टोळीच्या मनात कायद्याचा धाक उरला नव्हता. यापूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया देखील निष्फळ ठरल्या होत्या. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे बल्लारपूर शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विपीन इंगळे यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वी केली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, उमेश जोगदंड आणि बल्लारपूर डी.बी. पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
*चंद्रपूर पोलिसांचा इशारा स्पष्ट आहे – गुन्हेगारांना आता थारा नाही!*
sp India news channel मुख्य संपादक योगिता पाटेकर मो. 9604343287 जाहिराती व न्यूज करता संपर्क साधावा


